चोरट्या मार्गाने पाकिस्तानमध्ये वाढली निर्यात   

वृत्तवेध

दरवर्षी दहा अब्ज डॉलर (सुमारे ८५ हजार कोटी रुपये) पेक्षा जास्त किंमतीचा भारतीय माल व्यापारनिर्बंध मागे टाकून पाकिस्तानात पोहोचतो. दुबई, सिंगापूर, कोलंबो या बंदरांमधून त्याची वाहतूक केली जात आहे. ‘इकॉनॉमिक थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (जीटीआरआय)ने ही माहिती दिली आहे.
 
‘जीटीआरआय’ने सांगितले की, भारतीय कंपन्या विविध बंदरांवर माल पाठवतात. तिथे एक स्वतंत्र कंपनी माल उतरवते आणि गोदामांमध्ये उत्पादने साठवते. येथे वाहतूक करताना शुल्क न भरता माल साठवता येतो. गोदामात भारतीय उत्पादनांची लेबले बदलली जात आहेत. बंधित गोदामांमध्ये, मूळ देशाऐवजी वेगळा देश दर्शवण्यासाठी लेबले आणि कागदपत्रे बदलली जातात. भारतात उत्पादित केलेल्या वस्तूंवर ‘मेड इन यूएई’ असे लेबल लावले जाऊ शकते. या परिवर्तनानंतर त्या पाकिस्तानसारख्या देशांमध्ये पाठवल्या जातात. ही पद्धत कंपन्यांना भारत-पाकिस्तान व्यापार निर्बंधांना मागे टाकण्यास आणि तिसर्‍या देशाच्या मार्गाने जास्त किमतीत वस्तू विकण्यास मदत करते.

दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्याचे पाऊल उचलले. दरम्यान, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार पूर्णपणे थांबू शकतो, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्यवसाय आधीच खूपच कमी होता. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान पाकिस्तानला भारताची निर्यात ४४७.६५ दशलक्ष डॉलर होती, तर आयात ०.४२ दशलक्ष होती. २०२३-२४ मध्ये भारताची पाकिस्तानला होणारी निर्यात १.१८ अब्ज डॉलर होती. भारताची आयात २.८८ दशलक्ष डॉलर होती. भारताने २०२२-२३ मध्ये पाकिस्तानला ६२७.१ दशलक्ष डॉलर किमतीचा माल निर्यात केला. या कालावधीमध्ये आयात २०.११ दशलक्ष डॉलर झाली. भारताने २०२१-२२ मध्ये ५१३.८२ दशलक्ष डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात केली, तर २.५४ दशलक्ष डॉलर किमतीची उत्पादने आयात केली.

आयात शुल्कात वाढ

२०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे व्यापारी संबंध बिघडले होते. यानंतर भारताने शेजारील देशातून आयात होणार्‍या सर्व वस्तूंवरील आयात शुल्क २०० टक्क्यांपर्यंत वाढवले. यामध्ये ताजी फळे, सिमेंट, पेट्रोलियम उत्पादने आणि खनिज धातूंचा समावेश होता. यापूर्वी २०१७-१८ मध्ये, पाकिस्तानची भारताला होणारी निर्यात सुमारे ४८८.५ दशलक्ष डॉलरची होती. त्यावेळी फळे आणि सिमेंट या पाकिस्तानमधून आयात होणार्‍या दोन मुख्य वस्तू होत्या.
 

Related Articles